मा. श्री शिवाजीराव कचरे, (धर्मदाय सहआयुक्त, पुणे विभाग, पुणे) यांचे "श्री स्वामी समर्थ- औंध" पुरस्कार २०१८ सोहळ्यातील मनोगत

मा. श्री शिवाजीराव कचरे, (धर्मदाय सहआयुक्त, पुणे विभाग, पुणे) यांचे "श्री स्वामी समर्थ- औंध" पुरस्कार २०१८ सोहळ्यातील मनोगत
"श्री स्वामी समर्थ- औंध" पुरस्कार २०१८ सोहळ्यात आपले मनोगत व्यक्त करतांना मा. श्री शिवाजीराव कचरे, (धर्मदाय सहआयुक्त, पुणे)  

आजच्या कार्यक्रमाचे सत्कार मूर्ती, आदरणीय आव्हाड सर, सौ. आव्हाड वाहिनी, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरु कर्मळकर साहेब, माझे सहकारी नवनाथजी जगताप, त्यांचे नुकतेच आता प्रमोशन झाले आहे, धर्मदाय उपयुक्त झाले आहेत आता ते ! आणि आनंदाची गोष्ट म्हणजे पुण्यातच पोस्टिंग आहे. पुणे बार असोशिएशनचे नवनिर्वाचीत अध्यक्ष पवार साहेब. आमच्या ट्रस्टचे ज्येष्ठ विधिज्ञ मनोहरजी वाडेकर, तापकीर साहेब, या समर्थ प्रतिष्ठानचे अध्यक्ष श्रीकांतजी, उपस्थित बंधुभगिनींनो;

माझे सहकारी आत्ताच म्हणाले की न्यायाधीशाने बोललेले जरा चांगले असते. कारण न्ययाधीस म्हणले की फक्त त्याला ऐकायचे काम असते. त्यामुळे कोर्टात देखील आम्हाला वकीलांचेच ऐकावे लागते. मग अशी संधी सोडत नाही आम्ही.

आज या कार्यक्रमाला माझे सहकारी जसे म्हणाले कीएक वेगळी वेगळी उंची प्राप्त झाली आहे’. तर माझ्या दृष्टिकोनातून मी असेच म्हणेन की फारच मोठी उंची प्राप्त झालेली आहे. कारण या कार्यक्रमाचे एक न्हवे तर दोन कुलगुरु आहेत. कारण आव्हाड सरांचे हे चालते बोलते विद्यापीठ आहे. त्यांनी महाराष्ट्रात किती वकील निर्माण केले असतील त्यांचे त्यांना माहीत नसेल. परंतु आव्हाड सरांना मी वेगळ्या दृष्टिकोनातून मी बघतो. त्यांचा जेव्हढा कायदे क्षेत्रात अभ्यास आहे, धार्मिक क्षेत्रात पण त्यांचे तेव्हढेच योगदान आहे. ते फार छान कीर्तन करतात. नवरात्रामध्ये हमखास त्यांचे मोटादेवीच्या तिथे कीर्तन असते. या दोन्ही क्षेत्रामध्ये त्यांनी जी उंची गाठलेली आहे ती क्वचितच एखाद्या माणसाला प्राप्त करता येते

असंख्या विद्यार्थी त्यांनी या महाराष्ट्रात न्याय क्षेत्रात घडवले. आणि ते एकदम उत्तम प्रकारे काम करतात. मी पण त्या पैकीच एक आहे. सर आपले योगदान या समाजासाठी, या न्याय क्षेत्रासाठी फार उच्च कोटीचे आहे. आणि या समर्पक भावनेसाठी माझा शतशः आपल्याला प्रणाम आहे. आपण या पुरस्कारासाठी, खरंच मला असे वाटते की योग्य व्यक्ती निवडलेली आहे. आणि तुमचे स्वामी समर्थ प्रतिष्ठान जे आहे, या माध्यमातून तुम्ही जे समाज कार्य आणि समाजातल्या चांगल्या लोकांचे कौतुक करता, पुरस्कार देऊन, ते खरंच कौतुकास्पद आहे. स्वामी समर्थांचा मी एक भक्तच आहे. मी तुमच्या परिवाराचाच एक भाग आहे. त्याच्यामुळे वेगळे काही नाही माझ्यासाठी. परंतु एक चॅरिटी कमिशनर म्हणून ज्यावेळेस मी अशा संस्थांकडे बघतो त्या वेळेस खरंच असे वाटते की अशा संस्था जास्तिजास्त निर्माण झाल्या पाहिजेत.

आपल्या पुणे विभागामध्ये जवळपास एक लाख तेहेतीस हजार संस्था आहेत. परंतु त्यातल्या पन्नास टक्केच आपण कार्यरत आहेत असे धरुया. आणि या धार्मिक क्षेत्रामध्ये ज्या संस्था अशाप्रकारचे काम करतात तिथे खरंच आवर्जून जावेसे वाटते. कारण याच संस्था खरं म्हणजे समाजाला मार्गदर्शक ठरतील असे माझे मत आहे.

या कार्यक्रमाच्या निमित्ताने तुम्ही मला इथे बोलावले, या सोहळ्याचा साक्षीदार केले, त्या बद्दल आपल्या सर्व पदाधिकाऱ्यांचे आभार मानतो. आणि आमचे जगताप साहेब म्हणले त्या प्रमाणेच मलाही फार दिवसानंतर आव्हाड साहेबांना ऐकायचे आहे. त्याच्यामुळे मी माझे दोन शब्द पुरे करतो. धन्यवाद.

(दिनांक ५ मे २०१८ रोजी "श्री स्वामी समर्थ- औंध" पुरस्कार २०१८ सोहळ्यातील भाषणावरून संपादित)